वसई : वसई शहर हरित करण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी शेतकरी व नागरिकांना सवलतीच्या दरांमध्ये रोपे व कलमे उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्याकरिता विविध प्रकारची फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती आदींच्या उत्कृष्ट जातींची रोपे व कलमे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून आणली जाणार आहेत. येत्या पावसाळ्यात ही रोपे उपलब्ध करून देण्यात येतील, असे महापौर प्रवीणा हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले आहे.
महापौरांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीत वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर, बोईसरचे आमदार विलास तरे, माजी आमदार डॉमिनिक गोन्सालविस, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती बबनशेठ नाईक, वसई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश वझे, उपसभापती प्रकाश पाटील, संचालक अशोक कोलासो, ठाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, संचालक राजेश पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
‘वसई-विरारमधील नागरिकांना व शेतकऱ्यांना कोकण कृषी विद्यापीठातून चांगल्या जातीची कलमे, रोपे आणून दिल्यास, शेतकरी व नागरिक त्यांची जोपासना करून ती रोपे वाढवतील. त्यामुळे शहर अधिक हिरवे होण्यासाठी मदत होईल,’ असे मत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या बैठकीत व्यक्त केले. महापौर प्रवीणा ठाकूर आणि आयुक्त सतीश लोखंडे यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. इच्छुक नागरिकांना प्रती व्यक्ती दोन रोपे सवलतीच्या दरात देण्यात येतील व त्यापेक्षा जास्त रोपे हवी असल्यास पूर्ण रक्कम भरून घेता येतील, असे चर्चेमध्ये ठरले. ‘दापोलीहून रोपे आणण्यासाठी होणारा वाहतुकीचा आर्थिक भार कृषी उत्पन्न बाजार समिती उचलील,’ असे सभापती रमेश वझे यांनी सांगितले.